Wednesday, March 8, 2017

युपीत काय होणार ?

मागील 2 निवडणुका पाहिल्या तर मतदारांनी एकाच पक्षाला पूर्ण बहुमत दिल्याचे दिसते. आधी बीएसपी आणि नंतर समाजवादी पार्टीला पूर्ण बहुमत मिळाले. त्यानंतर अडीच वर्षांपूर्वी भाजपला अपेक्षपेक्षा अधिक जागा मिळाल्या. 80 पैकी तब्बल 71 म्हणजे जवळ जवळ 90 टक्के जागा मिळाल्या.

अखिलेश सरकारबद्दल नाराजी असल्याशिवाय भाजपला एवढ्या जागा मिळाल्या का ? असा प्रश्न विचारता येईल. किंवा राज्यात अखिलेश आणि केंद्रात मोदी असा विचार करून लोकांनी भाजपच्या पारड्यात भरभरून मते टाकली असणार. यातील दुसरा तर्क अधिक खरा असू शकतो. या घटनेलाही आता अडीच वर्षे उलटली आहेत.
 
युपीतील मतदारांनी मायावती यांच्यानंतर अखिलेश यांचा ५ वर्षांचा कार्यकाळ पाहिला आहे. या पार्श्वभूमीवर निकाल येत आहे. दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारला अडीच वर्षे झाली आहेत. युपीएप्रमाणे रोज घोटाळ्याच्या बातम्या बंद झाल्या आहेत. नोटाबंदीमुळे मोदींची प्रतिमा सामान्य लोकांमध्ये भ्रष्टाचार संपवणारा नेता अशी झाल्याचे अलीकडच्या निवडणुकांच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. अच्छे दिन आले नाहीत, तरी मोदी हे त्यासाठी प्रामाणिकपणे झटत आहेत, अशी लोकभावना आहे.

दुसरीकडे अखिलेश परिवारातील पिता - पुत्र आणि काकांतील भांडण आणि रहस्यमय पद्धतीने भांडण मिटणे याकडे जनता कशी पाहते, हे स्पष्ट व्हायचे आहे. काहींच्या मते यातून अखिलेश यांची प्रतिमा उजळली आहे. कांग्रेस आणि समाजवादी पक्षाची मते एकत्र आली आहेत. मतदारांसाठी मायावती टेस्टेड आहेत. त्यामुळे त्यांचा पक्षाला यावेळी स्थान मिळेल का ? हा प्रश्न आहे. जवळजवळ 100 मुस्लिम उमेदवार दिल्याने मुस्लिम मते मायावतींकडे वळतील असेही म्हटले जात आहे.

एकूण परिस्थिती पाहता युपीतून काय निकाल येईल हे सांगणे अधिक कठीण आहे.
तरीही काय होऊ शकेल याचा माझा अंदाज...
1. अखिलेश यादव यांची वैयक्तिक प्रतिमा वाईट नाही. सोबत कांग्रेसची मतेही आहेत. भाजपला टक्कर देणारा पर्याय म्हणून मुस्लिम मतेही बसपाऐवजी समाजवादी आणि कांग्रेसकडे वळण्याची अधिक शक्यता आहे. असे झालेच तर समाजवादी आणि कांग्रेस मिळून 225 च्या पुढे जागा येऊ शकतील.
2. भ्रष्ट अशी प्रतिमा झालेल्या कांग्रेसशी युती मतदारांना समजा भावली नाही. आणि मायावती यांनी मुस्लिमांना झुकते माप दिल्याने मुस्लिम मते विभागली गेली तर लोकसभा 2014 च्या निकालाची पुनवृत्ती होईल आणि भाजपला 260 पेक्षा अधिक जागा मिळतील.
3. तिसरा पर्याय नाही. मायावती यांचा पक्षा सत्तेत येण्याची शक्यता नाही आणि त्रिशंकू स्थितीही उद्भवणार नाही.
माझा तर्क मी मांडला आहे. पाहुया शनिवारी काय होते ते...
- सिद्धाराम
-----------------------------
महत्त्वाचे -
मणिपूर : कांग्रेस मुख्यमंत्र्यांनी नवीन जिल्हे बनवण्याची घोषणा करून जो डाव टाकला आहे तो कांग्रेसला फायदा मिळवून देईल, असे वाटते. मुळात येथे भाजप नव्हतीच. आता कुठे भाजपला आशा निर्माण झाली आहे. भाजप विजयी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गोवा : येथे पुन्हा भाजपच सत्तेत येईल असे वाटते. वेलिंगकर यांचा अट्टाहास नुकसान करेल असे वाटत नाही.
पंजाब : येथे आप आणि अकाली दल यांत कांटे की टक्कर होईल.
उत्तराखंड : 2014 मध्ये लोकसभेच्या सर्व जागा प्रचंड फरकाने भाजपने जिंकल्या होत्या. त्यानंतरही बऱ्याच घडामोडी झाल्या. येथे भाजप चांगल्या बहुमताने येईल.
((टीप - मी भविष्य वगैरे सांगत नाही. मनातील अंदाज शब्दांत मांडले इतकेच.))

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी