Wednesday, February 22, 2012

.. तर २०१७ मध्ये भाजपचा महापौर

आमचे मित्र श्री सुनील यांनी एक लेख लिहिला आहे. तो येथे देत आहे... 

सोलापुरात भाजप नगरसेवकांची संख्या वाढली आहे. त्याबद्दल पक्षाचे हार्दिक अभिनंदन. २००७ च्या निवडणुकीतील यशापेक्षा यावर्षीचे यश निश्चितच कौतुकास पात्र आहे. पण २००२ च्या निवडणुकीतील यशाच्या  तुलनेत आतापर्यंत पक्षाकडे सत्ता यायला हवी होती. ते अजून शक्य झाले नाही. याचे कारण २००७ च्या निवडणुकीत युती न करता पक्ष लढला. परिणामी सेना-भाजपा दोन्ही पक्षांना त्याची फळे भोगावी लागली.
 २००७ मध्ये केवळ भाजपचे तत्कालीन शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू यांच्यामुळे युती झाली नव्हती. परिणामी सोलापुरातील जनतेने त्यांनाच घरचा रस्ता दाखविला होता. तरीही यावर्षी त्यांना  उमेदवारी दिली गेली, पुन्हा घरचा रस्ता. २००७ मध्ये सोलापूरच्या शहराध्याक्षाने जे केले तेच यावर्षी नाशिकच्या शहराध्याक्षाने केले. परिणाम सत्तेपासून दूर राहावे लागले.  
सध्या सोलापुरात पुलोद्ची जोरदार चर्चा चालू आहे. म्हणजे भाजपा राष्ट्रावादी कॉंग्रेस सोबत जाणार आणि सत्ता स्थापन करणार का, अशी चर्चा सुरु आहे. पण या चर्चेने भाजपच्या निष्ठावान मतदाराच्या मनात चीड निर्माण होत आहे. जर भाजपाने  राष्ट्रवादीसोबत जावून सत्ता स्थापन केली तर ज्या वैचारिक धोरणामुळे जनतेने राष्ट्रवादीच्या विरोधात म्हणजे भाजपला मतदान केले त्यांच्याशी भाजपा गद्दारी करते, असे होत नाही का? ज्या अजित पवारांनी मुंडेंचे घर फोडले त्यांच्यासोबत संसार करणार का? राष्ट्रवादीचा उमेदवार चांगला असला तरी केवळ वैचारिक धोरणामुळे अनेक लोक त्याच्या विरोधात म्हणजे भाजपला मतदान करतात. वैचारिक धोरणामुळे भाजपला मतदान करणारा जो वर्ग आहे तो बदलत नसतो आणि ही पक्षाची जमेची बाजू आहे. पण केवळ सत्तेसाठी जर भाजपा राष्ट्रवादीसोबत जाणार असेल तर हा वर्ग नक्कीच नाराज होईल. 
शिवाय केवळ सत्तेसाठी राष्ट्रवादीसोबत जाणा-या भाजपची पुण्यात जी अवस्था झाली तीच सोलापुरातही  होईल. जनतेने ज्यांच्या विरोधात तुम्हाला मतदान केले त्याच्याशी पक्षाने प्रामाणिक राहावे. पुण्यामध्ये राष्ट्रवादीसोबत भाजपने सत्ता उपभोगली. दादोजी कोंडदेवांचा पुतळा कापला गेला तरी भाजपची सत्ता सुटली नाही. परिणाम समोर आहे. भाजपचे आज पुण्यात विरोधी पक्ष म्हणूनसुद्धा स्थान राहिले नाही. मनसेचे नगरसेवक भाजपपेक्षा जास्त आहेत. कारण वैचारिक धोरणामुळे मतदान करणारा वर्ग नाराज झाला. 
सध्या सोलापुरात शिवसेना कमकुवत होत आहे हे यावर्षीच्या निवडणुकीत दिसून आले. ( साहेबांकडून पैसे घेऊन निष्क्रिय राहणारे नेते असतील तर यापेक्षा काय होणार ? ) आगामी ५ वर्षे भाजपने विरोधी पक्ष म्हणून आक्रमक काम करावे. पेट्रोलचे सोलापुरात सर्वात जास्ती दर कशामुळे?, रस्त्यांची अवस्था, हद्दवाढ भागाच्या समस्या या विषयावर पक्षाने काम करावे. तसेच २०१७ मध्ये स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी आतापासून प्रयत्न करावे, संघटना वाढवावी. पण हे न करता जर राष्ट्रवादी सोबत सत्तेत सहभाग घेतला तर त्यातच आनंदी राहून पक्ष न वाढता आहे तेथेच राहील. तर  मग भाजपचा परंपरागत मतदार सुद्धा नाराज होईल  आणि २०१७ मध्ये भाजपकडे पाठ फिरवेल. परिणामी सोलापुरात भाजपला विरोधकाचे सुद्धा स्थान मिळणार नाही. 
प्रत्यक्षात सोलापूरचे मतदार हे भाजपला अनुकूल आहेत. पण त्यासाठी तसे नेतृत्व देण्याची आवश्यकता आहे. केवळ सोल्पुरातील प्रश्न घेवून येते ५ वर्षे लढण्याची गरज आहे. नक्कीच २०१७ मध्ये महापौर भाजपचाच होईल. पक्षाच्या प्रत्येक प्रामाणिक मतदाराची हीच भावना आहे. याचा विचार पक्षाच्या नेत्यांनी करावा.
( 9371934407)

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी