Sunday, October 30, 2011

विजय! पूर्ण विजय!!



युवाशक्तीला घातलेली साद



31 डिसेंबर 2008 ते 4 जानेवारी 2009 या कालावधीत महाराष्ट्रातील युवाशक्तीचे शेगाव (जि. बुलढाणा) येथे महाशिबीर झाले. संपूर्ण महाराष्ट्रातून 1377 तरुण-तरुणी या शिबिरात सहभागी झाले होते. युवा शक्तीला सकारात्मक साद घालणाऱ्या या उपक्रमाचा वेध घेणारा हा लेख.

स्थळ : शेगावजवळील आनंदसागर विसावा.
दि. 31 डिसेंबर 2008 ची संध्याकाळ.
18 ते 25 वयोगटांतील तरुण-तरुणी झुंडी-झुंडीने, घोळक्याने दाखल होत आहेत. यात सांगली-कोल्हापूरचे तरुण-तरुणी आहेत, तसे ठाणे-मुंबई-रत्नागिरीचेही आहेत. नागपूर-गडचिरोली-वर्ध्याचे आहेत तसे सोलापूर-लातूर-धाराशिवचेही आहेत. पुणे-नगरचे आहेत तसे अकोला-भंडारा-नांदेड-संभाजीनगर-परभणीचेही आहेत. एसटी बस आणि रेल्वेने आलेल्या तरुणांची एकच लगबग सुरू आहे.
प्रवेशद्वारात नोंदणी सुरू आहे. झुंडी-झुंडीने येणारे विविध गणांमध्ये विभागून शिस्तीच्या कोंदणात बसत आहेत. 25-25 जणांचे गण आपल्या गणप्रमुखाच्या मार्गदर्शनानुसार सभामंडपाकडे कूच करीत आहेत. "भारत माता की - जय', "जय भवानी- जय शिवाजी', "कौन चले भाय कौन चले- स्वीमीजी के वीर चले' या घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. मुख्य सभामंडपात गणश: आणि क्षेत्रश: शिबिरार्थींची बैठक व्यवस्था केली आहे. उभ्या रांगा आणि आडव्या ओळीत बसलेले 1500 तरुण ॐकार उच्चारण करीत भजनसंध्येत सहभागी झालेत. येथूनच चार दिवसांच्या शिबिराला सुरुवात झाली आहे. उद्यापासून या साऱ्यांना पहाटे 4.30 वा. उठून पहाटेच्या योगसत्रासाठी तयार व्हायचंय. सगळेजणं आपले भ्रमणध्वनी बंद करून आपापल्या गणप्रमुखांकडे दिले आहेत. शरीर, मनाने स्वत:च्या घडणीसाठी सिद्ध झालेत. ( photos http://poornvijay.blogspot.com/search?updated-max=2009-02-06T02%3A43%3A00-08%3A00&max-results=6)

कोणी आयोजित केलं होतं हे शिबीर?- विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या महाराष्ट्र प्रांताने. विवेकानंद केंद्र ही आध्यात्मिक पायावरील सेवासंघटना आहे. "मनुष्य निर्माण आणि राष्ट्र-पुनरुत्थान' हे विवेकानंद केंद्राचे ध्येय आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितलेले राष्ट्र-पुनरुत्थानाचे विचार युवकांपर्यंत पोचविणे, हा विवेकानंद केंद्राच्या कार्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, "माझा युवा पिढीवर फार विश्वास आहे. या युवकांमधूनच मला हवी असलेली माणसे मिळतील. सिंहाच्या हृदयाची ही माणसे सर्व प्रश्नांवर उत्तरे शोधून काढतील... जोपर्यंत तुम्हांमध्ये तारुण्याची तडफ आहे, जोवर तुम्ही थकले- भागलेले, गळालेले असे झालेले नाहीत, उलट तारुण्याच्या उत्साहाने आणि टवटवीने मुसमुसलेले आहात, तोपर्यंतच निश्चय करा! उठा, काम करा! नुकतेच उमललेले, हाताळलेले, वास घेतलेले पुष्पच ईश्वराच्या चरणी अर्पण करायचे असते! ...श्रेष्ठ आदर्श डोळ्यांसमोर ठेवा आणि त्यासाठी सर्वस्व समर्पण करा!'
भारताला आणि या साऱ्या विश्वाला आगामी शेकडो वर्षांपर्यंत मार्गदर्शक ठरतील एवढे सामर्थ्य स्वामी विवेकानंद यांच्या विचारांत आहे. (पाहा : टीप -1) थोर विचारवंत आणि नोबेल पारितोषिक विजेते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर जगाला सांगतात, " If you want to know India, study Vivekananda. In him everything is positive and nothing negative!"
सकारात्मक विचारांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. तरुणांना स्वामी विवेकानंदांच्या तेजस्वी विचारांची आणि चरित्राची ओळख व्हावी, विचारांमध्ये स्पष्टता यावी यासाठीच देशभरातील प्रांता-प्रांतांमधून "विजय! पूर्ण विजय!!' या उपक्रमाची विवेकानंद केंद्राने योजना केली आहे. महाराष्ट्रात जुलै 2008 मध्ये या उपक्रमाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. केंद्राचे कार्यकर्ते युवक कार्यकर्त्यांसह महाविद्यालयांमधून संपर्क करू लागले. भित्तीपत्रके, माहितीपत्रके, कार्यशाळा, विद्यार्थ्यांसमोर भाषणे या माध्यमांतून राज्यातील सुमारे 3 लाख विद्यार्थ्यांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोचविण्यात आली.
विवेकानंदांचे विचार आणि चरित्र यावर आधारित "विजय! पूर्ण विजय!!' या 100 पानी पुस्तकावर 1 तासाची वस्तुनिष्ठ चाचणी घेेण्यात आली. या चाचणीमध्ये 16 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. चाचणी परीक्षेतील निवडक 5 हजार तरुणांची एकदिवसीय शिबिरं ज्या त्या ठिकाणी घेण्यात आली. एकदिवशीय शिबिरांतून संपर्कात आलेल्या युवकांचे साप्ताहिक स्वाध्यायवर्ग ठिकठिकाणी घेण्यात आले. या स्वाध्याय वर्गांतून व्यक्तिमत्त्व विकासाला पूरक अशा अनेक गोष्टींचा परिचय करून देण्यात आला. या प्रक्रियेतून निवडण्यात आलेले 1377 युवक-युवती शेगाव येथील पाचदिवसीय महाशिबिरात दाखल झाले होते.
ही खोगीरभरती नव्हती. कापड तयार होतं ते कापसावर प्रक्रिया करून, वाळूवर किंवा चिखलावर नव्हे. याच न्यायाने ध्येयवादी, उत्साही तरुणांची निवड करण्यात आली होती. मनुष्य जोवर घर, गाव, कॉलेज या सुरक्षित वातावरणातून बाहेर पडत नाही, तोवर त्याच्या व्यक्तिमत्त्व विकासाला खऱ्या अर्थाने सुरुवात होत नसते. घराच्या सुरक्षित वातावरणातून बाहेर येणे ही व्यक्तिमत्त्व विकासाची पहिली पायरी असते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो कि.मी.चा प्रवास करून शेगाव येथे दाखल होणे, भ्रमणध्वनी जमा करून मनाने शिबिराशी एकरूप होणे ही तशी महत्त्वाचीच गोष्ट आहे.
ऋषी विश्वामित्रांसोबत निघालेले किशोरवयीन राम-लक्ष्मण, की जे राजवाड्यातून रथात आणि रथातून राजवाड्यातच वावरलेले असतात. ते विश्वामित्रांसोबत जंगलातून, डोंगरदऱ्यांतून, काट्याकुट्यातून मार्ग काढीत अनवाणी पायाने चालू लागतात. याला तप म्हटले जाते. तप ही व्यक्तिमत्त्व विकासाची दुसरी पायरी असते. शिबिरात सहभागी झालेले तरुण-तरुणी आपली पादत्राणे निवासाच्या खोल्यांमध्ये ठेवून बारीक-बारीक खडे असलेल्या परिसरात वावरत आहेत. थंडी झटकण्यासाठी पहाटे योगवर्गाच्या आधी विनापादत्राणे मैदानाला फेऱ्या मारताहेत. कॉलेजमध्ये वर्गाला दांडी मारणारी युवा पिढी पहाटे साडेचार वाजल्यापासून ते रात्री साडेदहापर्यंतच्या सगळ्याच सत्रांमध्ये सहभागी होत होते. होय, यालाच तप म्हणतात. व्यक्तिमत्त्व विकासाची ही दुसरी पायरी.
ताडकासारख्या मायावी असुरांनी उच्छाद मांडला होता. समाजाला त्राही त्राही करून सोडले होते. विश्वामित्रांनी युवा राम-लक्ष्मण यांना आसुरी शक्तींचा परिचय करून दिला आणि त्याचवेळी आसुरी शक्तींवर मात कशी करायची, याचे प्रशिक्षणही दिले. आपल्यासमोरील आव्हानांचा परिचय करून घेऊन आव्हानांना प्रतिसाद देण्यासाठी स्वत:ला तयार करणे ही व्यक्तिमत्त्व विकासाची तिसरी पायरी. या दृष्टीने शिबिरात बौद्धिक व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
विवेकानंद केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा निवेदिताताई (पूर्ण विजय) तसेच डॉ. अशोक मोडक (पुण्यभूमी भारत), विवेक घळसासी (विश्वविजयाचा आत्मविश्वास), प्रकाश पाठक (शोध खऱ्या भारताचा), सुनील चिंचोळकर (शिवरायांची युद्धनीती) आदी मान्यवर विचारवंतांनी बौद्धिक सत्रांमध्ये मार्गदर्शन केले. प्रत्येक सत्रानंतर गणश: त्यावर मंथन झाले. "व्यवहारात राष्ट्रभक्ती', "संघटित कार्याची आवश्यकता' आदी विषयांवर मंथन झाले.
मदरसा, घुसखोरी या माध्यमांतून फोफावत असलेला दहशतवाद, छळा-बळाने ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून वनवासी आणि भोळ्या समाजाचे होत असलेले मतांतरण, मार्क्सवादी विचाराने फोफावत असलेला लाल दहशतवाद, चंगळवादाने संस्कृती आणि देशाची होत असलेली अधोगती ही आजची आपल्या देशासमोरील आव्हाने आहेत. या आव्हानांना प्रतिसाद देण्यासाठी मनुष्य निर्माणाच्या कार्याला गती कशी द्यायची, इतिहासापासून प्रेरणा घेऊन येथील आध्यात्मिक मूल्यांच्या आधारावर शक्तिशाली भारताची निर्मिती कशी करायची आणि या कार्यात माझे योगदान पूर्ण क्षमतेने कसे राहील? हा शिबिरार्थींच्या चिंतनाचा विषय राहिला.
गेल्या 60 वर्षांत भारताने अन्नधान्य उत्पादनात घेतलेली भरारी, संगणक क्षेत्रात भारतीय तरुणांनी निर्माण केलेला दबदबा समजून घेताना आपल्या राष्ट्राचे ध्येय काय, हेही समजून घेण्याचा प्रयत्न झाला. हा देश एक राहू नये, नव्या पिढीने येथील परंपरांवर टीकाच केली पाहिजे, अशी करण्यात आलेली व्यवस्था, तरुणांना भ्रमित करण्यासाठी योजिलेली कारस्थानेही समजून घेतली गेली.
कोणतेही काम करायचे ते यशस्वी होण्यासाठीच! संघटित झाल्याशिवाय पर्याय नाही. क्षमतावान कार्यकर्ताच संघटन करू शकतो. काही चुका होत असतात. सगळ्याच देशांत चुका होतात, म्हणून चुकांना कवटाळण्याचे, त्या चालू ठेवण्याचे कारण नाही. सर्व भेद दूर करून, किल्मिषं दूर करून एकत्र आलं पाहिजे. राष्ट्रकार्य म्हणजे कसरत नाही; तो स्वभाव झाला पाहिजे. नाचाच्या जागी नाच, विनोदाच्या ठिकाणी विनोद-पण यावेळी ध्येय विसरता कामा नये. संघटन हा माझ्या ध्येयाप्रत जाणारा पहिला मार्ग आहे. सद्भावनेने कार्यं करतात त्यांचं हृदय खूप हळवं असतं. क्रियाशून्य सद्भावनेतून संघटन करता येत नाही. चारित्र्यामुळे सद्भाव निर्माण होतो. रसायन शुद्ध नसेल तर रिझल्ट ऍक्युरेट येणार नाही. म्हणून तरुणांकडे सद्भाव, चारित्र्य आणि बळकट मन असले पाहिजे. माझं शरीरही बलवान पाहिजे. माझा आदर्श हनुमान असला पाहिजे. सतत भोगाचं चिंतन आपल्याला दुर्बल बनवतं. आपण बलवान झालो नाही तर ईश्वरही आपल्याला मदत करीत नाही. मन-मेंदू आणि शरीराने आपण बलवान असले पाहिजे. अतिशय सकारात्मक चिंतनातून आणि आत्मगौरवातूनच आत्मविश्वास येतो. यातूनच मनुष्य निर्माण आणि राष्ट्र-पुनरुत्थानाचा मार्ग जातो.
सर्वांनाच विजय हवा असतो, पराभव कोणालाही नकोच असतो. विजय हा मनुष्य स्वभावच आहे. विजयाची संकल्पना स्पष्ट नसेल तर मात्र गडबड होऊ शकते. अध्यात्म हे कधीही एकांगी नसते. आपल्या ऋषीमुनींच्या तपातून या राष्ट्राची निर्मिती झाली आहे. शेणातील किडेही आनंदाने वळवळत असतात. रस्त्यावरील कुत्रेही आनंदात भटकतात. मनुष्याचे जीवन या प्रकारचे नाही. "मी'च्या शोधातून "विकास' होतो. मानवाला कर्मस्वातंत्र्य आहे, तसे इतर प्राण्यांना नाही. व्यक्तीचे विस्तारित रूप कुटुंब-जाती-समाज-राष्ट्र आहे. अहिंसेचा अर्थ समष्टीच्या दृष्टिकोनातून समजून घेतला पाहिजे. समष्टीला धोका उत्पन्न करणारे तत्त्व नष्ट करणे ही अहिंसाच होय. स्वसंरक्षण आणि जगाच्या कल्याणाचा विचार एकाचवेळी करायचा आहे. स्वरक्षणाकडे दुर्लक्ष करून केवळ जगाच्या कल्याणाचा विचार भ्रमित मनाचे लक्षण आहे. आपले शत्रू कोण? हे कळले नाही तर सर्वनाश अटळ असतो! श्रीमती (मदर) तेरेसासारखी लब्धप्रतिष्ठित मंडळीही हिंदूंना ख्रिस्ती करण्यासाठी कसे कारस्थान करीत होती, हे समजून घेतले पाहिजे.
भारतीय विचारधारा सर्वसमावेशक आहे. सारे जग माझ्याच धर्माचे बनले पाहिजे असा दुराग्रह हिंदूंमध्ये नाही.
If India lives who dies?
If india dies who lives? म्हटले जाते. याचे रक्षण करणे आणि आव्हाने समजून घेणे हेच आपले कार्य आहे. या राष्ट्राने कधी कोणावर हल्ला केला नाही. भारताचे हात रक्ताळलेले नाहीत. आपण चिरंतन राहणार आहोत, आपण विजयी होणार आहोत! हा आत्मविश्वास असला पाहिजे. भारतीय देवतांच्या हाती शस्त्रं आहेत आणि अभयमुद्रा आहे. "सर्वांचे कल्याण परंतु स्वसंरक्षणही' हाच संदेश देवता देतात, असे विचार बौद्धिकांतून देण्यात आले.

शिबिरातील विशेष नोंदी

अनुशासनातून प्रेरणा उत्पन्न होते। शेगावच्या युवा शिबिराचे एका शब्दात वर्णन करायचे तर "अनुशासन' या शब्दात करता येईल. "उत्थितो भव'च्या आज्ञेसरसी एका क्षणात सभामंडपातील 1500 युवक ताडकन उठून स्तब्ध उभे असायचे. "आसीनो भव' आज्ञा झाल्यानंतर बसलेले असायचे.


सभामंडपातून गणश: बाहेर येणारे सारे भोजन करून एका तासात परत सभामंडपाच्या ठिकाणी गीतसत्रासाठी बसलेले असायचे.
सायंकाळी सूर्य मावळतीला असताना सभामंडपाच्या भोवताली असलेल्या विस्तीर्ण मैदानात दररोज क्रीडायोगाचे सत्र होत होते। सोनेरी उन्हामध्ये दीड हजाराच्या संख्येतील तरुण-तरुणी 25-25 जणांच्या गणांतून खेळात रमलेले दृश्य शब्दांत वर्णन करणे कसे शक्य आहे? पंच प्यारे, नौका दौड, शेर नही तू बकरी है, टॅंक युद्ध, कलिंगडाची फोड, नमस्कारम्या भारतीय खेळांचा आनंद काही औरच होता! खेळाच्या शेवटी क्षेत्रश: (एका क्षेत्रात 5 गण = 125 संख्या) एकत्रीकरण होऊन क्रांतिकारी महापुरुषांच्या जीवनातील स्फूर्तिदायी प्रसंग सांगितले जायचे. मदनलाल धिंग्रा यांच्या बलिदानाला 100 वर्षे होत आहेत, त्या मिमित्ताने त्यांचे स्मरण जागविले गेले. मदनलाल यांची तडफ ऐकून तरुणांचे बाहू स्फुरण पावले नसते तरच नवल ठरले असते. धर्म-संस्कृती आणि राष्ट्र संकटात असताना हे भजन, पूजन, ध्यान आदी काय कामाचे? धर्मरक्षणासाठी हाती शस्त्र घ्या, अशी हाक देणारे गुरू गोविंदसिंग यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांचेही जागरण यावेळी करण्यात आले.


"मन वज्र हवे अन्मनगट ते पोलाद' विवेकानंदांनी तरुणांना दिलेला संदेश, शरीर मनाच्या दृढतेसाठी आवश्यक.
"विजय! पूर्ण विजय!!' हा उपक्रम महाराष्ट्रातील अधिकाधिक महाविद्यालयांपर्यंत पोचविण्यासाठी आपल्या उमेदीच्या काळातील 8-10 महिने पूर्ण वेळ काम करणाऱ्या युवकांच्या उल्लेखाशिवाय हा लेख अपूर्णच राहील। वाईच्या सॉफ्टवेअर अभियंता असलेल्या ज्योतीताई हेरकळ या उपक्रमाच्या समन्वयक होत्या. मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदवी नुकतीच घेतलेला धाराशिवचा सुनीलदादा, बीएड पूर्ण करून या कामात आलेला सोलापूरचा मदगोंडा हक्के, नाशिकचा प्रमोद वाघ, विदर्भ पिंजून काढणारा अतुलदादा, मुंबईचा गौरीशंकर घाळे, डॉ. मोरेश्वर राठोड, ताकेलूमभैय्या, पद्मनाभ भैय्या, मीराताई हे पंचविशीतले तरुण पूर्णवेळ काम करीत होते. त्यांच्या दिमतीला मदगोंडा, चेतन, स्नेहाताई, आसावरी, प्रिया, सारिका, मंगेश, महेश, संतोष, श्रीरंग, सिद्धाराम, श्रीकांत, गणेश, आनंद घाटनुरे अशा तरुणांची फळी सज्ज होती. आदरणीय किशोरजी (जीवनव्रती कार्यकर्ते), बसुजी, सुहासजी, धनंजयदादा, अभयजी, जयंतजी, प्रांजलीताई, पाटीलकाका आदींचे मार्गदर्शनही होते. महाराष्ट्र प्रांत निमंत्रक म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या सक्रीय स्फूर्तीशिवाय हा रथ पुढे गेला असता काय? "करावयास लागा म्हणजे तुम्हास कळून येईल की, तुमच्यात किती प्रचंड सामर्थ्य आहे.' या स्वामी विवेकानंदांच्या उद्धरणाची अनुभूती हीच या साऱ्यांची प्रेरणा होती.


महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जगतात शेगावच्या गजानन महाराज देवस्थानचे स्थान आदर्शवत असे आहे। सेवाप्रकल्पांचा वटवृक्ष निर्माण करणाऱ्या आदरणीय शिवशंकरभाऊ पाटील यांनी जणू शिबिराचे पालकत्वच स्वीकारले होते. ज्यांनी शेगाव येथील देवस्थान आणि देवस्थानकडून चालणारी कार्ये पाहिली आहेत, त्यांना भाऊंच्या कार्याची कल्पना येऊ शकते. शिस्त, नेटकेपणा यासोबतच प्राचीन आणि आधुनिक यांचा समन्वय त्यांच्या कार्यातून जाणवतो. तरुणांचा हा कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी देवस्थानने सर्वप्रकारचे सहकार्य सानंदे देऊ केले होते.


"दादा, शिबीर आणखी चार-पाच दिवस असायला हवे होते।' असे कंठ दाटून आलेल्या स्वराने आपल्या गणप्रमुखांकडे आर्जवं करणारे तरुण हे शिबिराचे यश आहे. "आम्ही आमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आयुष्यातील दोन वर्षे पूर्णवेळ सेवाव्रती बनून राष्ट्रकार्यासाठी द्यायला तयार आहोत', असे उत्स्फूर्तपणे सांगत पुढे आलेली 176 ही तरुण-तरुणींची संख्या स्वामीजींचा युवा पिढीवरील विश्वास सार्थ होता आणि आहे, हे दाखविणारे होते. शिबिरातून गेल्यानंतर आम्ही आमच्या ठिकाणी तरुणांसाठी विवेकानंद केंद्राचे उपक्रम सुरू करू. शिबिरातील विचारांची, संस्कारांची शिदोरी आमच्या तरुण बांधवांमध्ये पसरवू! असा संकल्प करून जो तो आपल्या गावी परतत होता. शिबीरस्थळातून परतताना सर्वांचीच पाऊले जड झाली होती; पण प्रत्येकजण एक संकल्प घेऊन बाहेर पडत होता-


पूर्ण विजय संकल्प हमारा, अनथक अविरत साधना
निशीदिन प्रतिपल चलती आयी, राष्ट्रधर्म आराधना।।
वंदे मातृभूमी वंदे, वंदे जगज्जननी वंदे
मातृभूमी आराध्य हमारी, राष्ट्रभक्ती है प्रेरणा ।।
ईश्वरीय है कार्य हमारा, जीवन की संकल्पना
देशभक्ती के श्रेष्ठ मार्ग पर, चरैवेती की कामना ।।



अतुलनीय धैर्याने युक्त अनुशासित युवा शक्ती हीच देशाच्या भवितव्याची सर्वात मोठी संपत्ती आहे. युवकांमध्ये ध्येयवाद असतो. ध्येयवादाला वास्तवात आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षात स्वत:ला झोकून देण्याची निर्भयता युवकांमध्ये असते. याशिवाय ध्येयाचा शेवटच्या क्षणापर्यंत पाठपुरावा करण्याचे मानसिक शारीरिक बळ युवकाकडे असते. केवळ त्यांच्यातील ऊर्जेला दिशा देण्याची आवश्यकता असते. त्यांच्यासमोर योग्य आणि उदात्त ध्येय ठेवलं गेलं तर त्यावर श्रध्दा ठेवून अत्यंत उत्साहाने ते काम करू लागतात. "विजय! पूर्ण विजय!!' हा उपक्रम म्हणजे युवाशक्तीला घातलेली साद आहे.



टीप-1
जपानचे पंतप्रधान ऍबे सिंझो हे भारतभेटीवर आले होते. भारताच्या संसदेच्या संयुक्त सभेला त्यांनी दि. 22 ऑगस्ट 2007 रोजी संबोधित केले. आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या उद्धरणाने केली.
ते म्हणाले, "" The different streams, having their sources in different places, all mingle their water in the sea. भिन्न भिन्न प्रवाह विभिन्न ठिकाणांतून निघाले तरी त्या सर्व प्रवाहांचे पाणी शेवटी समुद्रालाच येऊन मिळते...
...स्वामी विवेकानंद म्हणजे भारताने साऱ्या विश्वाला दिलेली महान देणगी होय. ते महान आध्यात्मिक नेते होते. त्यांच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात करताना मला अत्यानंद होत आहे... ...स्वामी विवेकानंद यांनी जपानमधील थोर विचारवंत तेनशिन ओकाकुरा यांच्याशी मैत्री केली होती. ओकाकुरा यांना स्वामी विवेकानंद यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले होते. इतकेच नव्हे तर विख्यात महिला समाज सुधारक भगिनी निवेदिता यांचे सान्निध्यही त्यांना प्राप्त झाले होते. तेनशिन ओकाकुरा यांची विचारधारा आधुनिक जपानच्या सुरुवातीच्या काळाहून अधिक परिपक्व होती. तेनशिन ओकाकुरा हे एक प्रकारे नवचेतन युगाचे प्रतिपादक होेत.''
ऍबे सिंझो यांनी आपल्या प्रदीर्घ भाषणात ठायी-ठायी स्वामी विवेकानंदांचा उल्लेख केला. शिकागो येथील विश्वप्रसिद्ध भाषणांतून संपूर्ण जगाला दिशा दाखविणारा भारतीय मार्ग विवेकानंदांनी सांगितला आहे.
उद्योग विश्वात भारताला मानाचे स्थान मिळवून देणारे जमशेटजी टाटा असोत की महानायक नेताजी सुभाष, वीर सावरकर असोत की गांधीजी, अथवा भारतातील क्रांतिकारकांची चळवळ, या साऱ्यांनी स्वामी विवेकानंदांपासून प्रेरणा घेतली आहे, याला इतिहास साक्षी आहे.
छायाचित्रातून शिबीर दर्शन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी