Friday, August 13, 2010

हाणामारी-दंगली टाळता येऊ शकतील

सोलापुरातील दत्त चौक भागात मंगळवारी रात्री दोन गटांत हाणामारी झाली. लागलीच सगळीकडे दंगल पेटल्याची "अफवा' पसरली. रात्री सव्वा दहाच्या सुमारास हैदराबादेत राहणाऱ्या एका मित्राचा फोन आला. दत्त चौकात काही गडबड आहे पाहा, असे त्याने सुचविले. चौकशी करून मी सिव्हिल हॉस्पिटलला पोचलो. जखमी असलेल्या कुरेशी गटातील तरुणांवर उपचार सुरू होते. बाहेरील बाजूला कुरेशी नावाचे एक साठीतले दाढीधारी गृहस्थ पत्रकारांना माहिती देत होते.
"खाटीक मशीद भागात आमच्या (मुस्लिम) समाजाची फक्त 50 घरे आहेत. (5-10 घरॉं हंई, दुसरा म्हणतो.) त्यांनी अल्पसंख्याकांवर अन्यायाची सीमा ओलांडून अन्याय केला आहे. अल्पसंख्याकांवर दहशत बसविण्यासाठीच आम्ही पुरुष मंडळी घरात नसताना ठरवून हा हल्ला केला गेला. अल्लाताला त्यांना धडा शिकवीलच. आम्हीही कायदेशीररीत्या त्यांना सोडणार नाही... भारी पडू... आमदार आमच्याकडे फिरकलेही नाहीत पण "भाऊ' मात्र आमच्या मोहल्ल्यात घरी येऊन धीर देऊन गेले...' वगैरे माहिती कुरेशी महोदय देत होते.
दत्त चौक-सोन्या मारुती भागात त्यांच्या समाजाची कमी घरे आहेत म्हणून त्यांच्यावर दहशत बसविण्यासाठी हल्ला झाल्याचे कुरेशी म्हणत आहेत. या भागात गेल्या काही वर्षांत मुस्लिमांची संख्या अचानक कृत्रिमरीत्या वाढल्याची या भागातील हिंदू समाजाची भावना आहे. काही बांगलादेशी घुसखोर या भागात बस्तान थाटत असल्याचीही चर्चा आहे. नेमका काय प्रकार आहे हे पोलिसांनीच खोलात जाऊन चौकशी केली तर ध्यानात येऊ शकेल, पण कालच्या हाणामारीचा मूळ मुद्दा वेगळाच आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार पूर्ववैमनस्यातून दोन गटांत हाणामारी झाली आहे. म्हणजेच त्या दोन्ही गटांतील ठराविक मंडळींचा या हाणामारीत सहभाग आहे, परंतु कुरेशी गट मात्र याला हिंदू-मुस्लिम असे रूप देण्याचा प्रयत्न करीत आहे काय, हे तपासले पाहिजे. तसे असेल तर ही बाब हाणामारीपेक्षाही अधिक गंभीर आहे.
त्या भागात केवळ पन्नासच घरे मुस्लिमांची आहेत म्हणून त्यांच्यावर दुसऱ्या समाजाने म्हणजे हिंदूंनी दहशत बसविण्याचा प्रयत्न केला, असे म्हणणे अपरिपक्वपणाचे आहे. तसे पाहिले तर कितीतरी खेड्यांमध्ये 2-4 घरे मुस्लिमांची आणि बाकी सर्व हिंदूंची, असे असूनही कधी हिंदूंनी त्यांच्यावर दहशत बसविल्याच्या वार्ता नाहीत. उलट खेड्यातील मुस्लिमांचे सण हिंदूच पुढाकार घेऊन साजरे करताना दिसतात. शहरातही हिंदुबहुल भागातील मुस्लिम दहशतीत राहतात असे दिसत नाही. मात्र याउलट अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. दोन वर्षांपूर्वी (2 ऑक्टो. 2008) लक्ष्मी मंडईजवळील मुस्लिमबहुल भागात शिलाई दुकान मुस्लिमांच्या सणाच्या दिवशी का चालू ठेवला असे विचारत काहींनी लोखंडी सळयांनी गंभीर हल्ला केला होता.
2002 साली अमेरिकेतील कोण एक ख्रिस्ती पाद्री मोहम्मद पैगंबर यांचा अपमान केला म्हणून सोलापुरातील मुस्लिमबहुल भागात देवीची मूर्ती फोडून दंगल घडविण्यात आली होती. गेल्यावर्षी आसरा चौकाजवळ रिक्षावाल्याने मागून मोटरसायकलीला धडक दिली. चूक रिक्षावाल्याची असूनही रिक्षावाल्याने "मॉं की ---' शिवी हासडली. वाद वाढतोय असे दिसताच, दोन-चार मिनिटांत 10-12 जण रिक्षावाल्याच्या बाजूने धावून आले आणि त्या मोटरसायकलवाल्या दोन्ही मुलांना बदडले. रिक्षावाला त्या परिसरातील नसताना आणि त्याची चूक असतानाही त्याच्या बाजूने त्याचे समाजबांधव धावून आले.
हिम्मतराव देशभ्रतार यांनी आयुक्तपदाची सूत्रे घेऊन चार दिवस होत नाहीत तोपर्यंत विजापूर वेस येथील घड्याळाच्या दुकानावर 100-125 जणांच्या जमावाने हल्ला केला. एक दारू प्यालेला मुस्लिम गृहस्थ घड्याळाचे पैसे कमी घे असे दुकानदाराला दरडावतो. दुकानदार ऐकत नाही म्हटल्यावर बाहेर येऊन गोंधळ करतो. 5-10 मिनिटांत 100-125 समाजबांधव त्याची कड घेऊन दुकानावर हल्ला करतात, हे काय दर्शविते?
या आणि अशा गोष्टींचा कुरेशी साहेब तुम्ही विचार करणार आहात काय? पूर्ववैमनस्यातून जर हाणामारी झाली असेल, तर त्याला हिंदू-मुस्लिम वादाचे रूप देणे चुकीचे आहे. अशा अफवांमधूनच दंगली होतात असे आम्हास वाटते. समजा या दोन गटांतील हाणामारी पूर्ववैमनस्यातून नसेल तर ती का झाली याचा शोध घेण्याची जबाबदारी पोलिसांची आहे.
दत्त चौक परिसरात एक शाळा आहे. या भागात हिंदू तरुणींची नेहमीच छेड काढली जाते. कुणी जाब विचारायला गेले की, झुंडशाही निर्माण करून तरुणींच्या पालकांनाच गप्प केले जाते. या प्रकारातूनच असंतोष वाढत जाऊन कालची हाणामारी झाली असे म्हटले जात आहे. मध्यंतरी "लव्ह जिहाद'ची चर्चा होती. तसा प्रकार तर येथे नाही ना, याचीही शहानिशा झाली पाहिजे. दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे.
हा विषय फक्त सोलापुरपुरता मर्यादित नाही. संदर्भ सोलापूरचा असला तरी कमी-अधिक फरकाने सगळीकडे अशा घटना घडत असतात. सर्वसामान्य हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाला दंगल, हाणामारी नकोच असते, परंतु काही मंडळी वैयक्तिक वैमनस्याला हिंदू-मुस्लिम वादाचे रूप देत असतील तर संबंधित समाजातील विचारी लोकांनी असे प्रकार थांबविले पाहिजे. मुलींची छेडछाड करून हिंदू समाजाला डिवचण्याचे प्रकारही थांबले पाहिजेत. महाविद्यालये, मोहल्ले यांमधून असे प्रकार होणार नाहीत यासाठी पोलिसांची स्वतंत्र यंत्रणा किंवा पथकच असले पाहिजेत. असे झाले तर वेळ हाणामारीपर्यंत येणारच नाही. याचबरोबर दोन्ही समाजांत सुसंवाद निर्माण होण्यासाठीही प्रयत्न झाले पाहिजेत. असे झाले तर हाणामारी-दंगली टाळता येतील.

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी